top of page

एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घ्या – अँड. अमोल मातेले यांचा सरकारवर तीव्र हल्ला

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Jan 27
  • 2 min read

27 January 2025


मुंबई: एसटी भाडेवाढीच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि मुंबई युवक अध्यक्ष अँड. अमोल मातेले यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. सरकारच्या गोंधळलेल्या धोरणांवर कडाडून टीका करत त्यांनी सरकारमधील अंतर्गत गोंधळ आणि जबाबदारीच्या अभावावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Video

"जनतेवर आर्थिक बोजा नको!" मातेले यांनी एसटी सेवा ग्रामीण आणि शहरी जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगून, भाडेवाढीमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांवर आर्थिक बोजा वाढत असल्याचा मुद्दा मांडला. "एसटी सेवा म्हणजे सामान्य जनतेसाठी जीवनरेखा आहे. भाडेवाढीमुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. सरकारने त्वरेने हा निर्णय मागे घेऊन लोकांना दिलासा द्यावा," अशी मागणी त्यांनी केली.


सरकारमधील गोंधळावर प्रश्नचिन्ह परिवहन खात्याच्या भाडेवाढीच्या निर्णयामागे असलेल्या गोंधळावर टीका करताना मातेले म्हणाले, "जर भाडेवाढीचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी घेतला नसेल, तर मग हा निर्णय कोणी घेतला? सरकार चालवतंय कोण? मंत्री जबाबदारी नाकारत आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्याला विरोध करत आहेत. मग हा निर्णय नेमका कोणाचा आहे?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.


अधिकाऱ्यांवर कारवाईचा आग्रह "जर हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल, तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही? चुकीच्या निर्णयांना अधिकाऱ्यांना दोष देणं आणि चांगल्या निर्णयांचं श्रेय मंत्र्यांनी घेणं, ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे," असे म्हणत मातेले यांनी सरकारची तीव्र शब्दांत कानउघडणी केली.


सरकारमधील अंतर्गत वादांवर टीका सरकारमधील अंतर्गत गोंधळ आणि भांडणांवर मातेले म्हणाले, "एसटी सेवा ही महत्त्वाची असतानाही सरकारकडे कोणताही ठाम निर्णय नाही. मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये जबाबदारी टाकण्याचा खेळ सुरू आहे. परिणामी, सामान्य जनता त्रस्त आहे. सरकारमध्ये काहीतरी ‘गंमत-जंमत’ सुरू आहे का?" असा उपरोधिक सवाल त्यांनी केला.


राजकीय जबाबदारीची गरज "सरकारने जनतेच्या हितासाठी काम करणे आवश्यक आहे. मात्र, येथे फक्त गोंधळ सुरू आहे. जर सरकारला जनतेची काळजी नसेल, तर त्यांनी सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकारही नाही," असा गंभीर आरोप मातेले यांनी केला.


सरकारने सामान्य जनतेच्या हिताचा विचार करत एसटी भाडेवाढीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

bottom of page