केंद्रीय मंत्री रामदास आठवले एअर इंडियाच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे अडकले, नागरी उड्डाण मंत्र्याकडे तक्रार
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز

- Oct 9, 2024
- 1 min read

मुंबई 9 ऑक्टोबर 2024 - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज एअर इंडियाच्या एआय 866 या विमानाने दिल्लीला रवाना होण्यासाठी मुंबई विमानतळावर सकाळी 9 वाजता आले होते. त्यांना पंतप्रधान कार्यालयातील महत्वाच्या बैठकीत सहभागी व्हायचे होते. मात्र, विमान उड्डाण करण्यापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान पुन्हा मुंबई विमानतळावर आणावे लागले.
या बिघाडामुळे ना. आठवले आणि अन्य प्रवाशांना चार तासांहून अधिक वेळ विमानात अडकून राहावे लागले. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत विमान विमानतळावरच उभे राहिले, ज्यामुळे सर्व प्रवासी खोळंबलेले होते. प्रवाशांमध्ये नाराजी पसरली, आणि ना. आठवले यांनी देखील एअर इंडियाच्या या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
ना. आठवले यांनी सांगितले की, विमानातील बिघाड झाल्यास प्रवाशांना दुसऱ्या विमानाने त्यांच्या गंतव्यस्थळी पोहोचवणे अपेक्षित होते. मात्र, एअर इंडियाने 6 तासांपेक्षा अधिक काळ प्रवाशांना विमानातच अडकवून ठेवले, ज्यामुळे त्यांचा अमूल्य वेळ वाया गेला. या बाबत ते नागरी उड्डाण मंत्री के. आर. नायडू यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.



