top of page

महाराष्ट्रातील 288 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आदर्श आचारसंहिता समाप्त

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Dec 22, 2025
  • 1 min read

22 December 2025


मुंबई (मिम टाइम्स) राज्यातील 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या हद्दीत लागू असलेली आदर्श आचारसंहिता तत्काळ रद्द करण्यात आल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. याबाबत निवडणूक आयोगाने अधिकृत आदेश जारी केला आहे.


राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 21 डिसेंबर 2025 रोजी राज्यातील सर्व संबंधित जिल्ह्यांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडणूक निकालांचाही अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता कायम ठेवण्याची आवश्यकता उरलेली नाही.


निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांच्या अनुषंगाने घेण्यात आला आहे. या आदेशांनुसार निकाल जाहीर होईपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याने आचारसंहिता समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयोगाने हेही स्पष्ट केले आहे की, आदर्श आचारसंहिता रद्द करण्याचा निर्णय केवळ ज्या 288 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका झाल्या आहेत, त्या विशिष्ट भौगोलिक हद्दीपुरताच मर्यादित राहील. इतर भागांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.


राज्य निवडणूक आयुक्तांच्या निर्देशानुसार उपसचिव के. सूर्य कृष्णमूर्ती यांनी या संदर्भातील आदेश सर्व जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख आणि संबंधित विभागांना पाठवले असून, त्यामुळे विकासकामांसह इतर प्रशासकीय कामकाज पुन्हा पूर्ववत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.












bottom of page