top of page

मानवतेचा, दातृत्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला: देवेंद्र फडणवीस यांची रतन टाटांना श्रद्धांजली

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Oct 10, 2024
  • 1 min read

मुंबई, दि. १०: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने देशाने एक महान व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या निधनामुळे मानवता, दातृत्व, आणि विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशातून व्यक्त केली आहे.



रतन टाटा हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते, तर त्यांच्या विचारांनी आणि कार्याने संपूर्ण देशाला आपलेसे केले होते. समाजाचा सातत्याने विचार करणारे, माणुसकीने ओतप्रोत, आणि अत्यंत विनम्र अशा व्यक्तिमत्त्वाचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. शिक्षण, ग्रामविकास, कुपोषण आणि आरोग्य या क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. देशाच्या आर्थिक विकासाबरोबरच मानवतेच्या विकासात त्यांनी दिलेल्या योगदानाला विसरता येणार नाही.

फडणवीस यांनी त्यांच्या शोकसंदेशात नमूद केले की, "समाजातून कमावलेले समाजालाच परत देण्याची श्रद्धा त्यांनी नेहमी जपली. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कर्करोग रुग्णांसाठी सुरु केलेल्या सेवांपासून ते मुंबईत उभारलेल्या प्राण्यांच्या रुग्णालयापर्यंत, त्यांच्या करुणेची ही उदाहरणे आहेत."



देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, मुख्यमंत्री असताना त्यांनी व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशनची निर्मिती केली, ज्यासाठी रतन टाटा यांचे सतत सहकार्य होते. राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' या उपक्रमातही त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. नागपूरमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटची स्थापना करताना रतन टाटा यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळाला होता.

"रतन टाटा यांचे निधन हे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी मोठी हानी आहे. त्यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो," असे भावनिक उद्गार फडणवीस यांनी काढले.



रतन टाटा यांच्या निधनाने देशभरातून शोक व्यक्त केला जात असून, त्यांच्या अमूल्य योगदानामुळे ते नेहमीच स्मरणात राहतील.

bottom of page