८ मार्चला मीरा-भाईंदर येथे नव्या दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन; सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- Feb 26
- 1 min read

26 February 2025
मीरा-भाईंदर: मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत, येथील नव्या दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन ८ मार्च २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हा वकील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शहरवासीयांना मोठा दिलासा
सतत वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे मीरा-भाईंदरच्या नागरिकांना विविध न्यायालयीन कामांसाठी ठाणे शहरात जावे लागत होते. त्यामुळे वेळेचा आणि पैशांचा मोठा अपव्यय होत होता. ही समस्या दूर करण्यासाठी २००९ पासून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या भागात प्रशासकीय व न्यायालयीन कार्यालये स्थापन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले असून, अखेर मीरा-भाईंदर शहराला स्वतःचे दिवाणी न्यायालय मिळाले आहे.
८ मार्चला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उद्घाटन
या नव्या न्यायालयाचे उद्घाटन ८ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत हा महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नव्या न्यायालयामुळे स्थानिक नागरिकांचे चार तासांचा प्रवास आणि अनावश्यक आर्थिक भार कमी होणार आहे.
प्रताप सरनाईक यांनी केली इमारतीची पाहणी
दिवाणी न्यायालयाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नव्या इमारतीची पाहणी केली. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना २ मार्चपर्यंत अंतर्गत सजावट आणि उर्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
वकील संघटना आणि नागरिकांत उत्साह
मीरा-भाईंदरमध्ये दिवाणी न्यायालय सुरू होत असल्याने येथील वकील संघटना आणि स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे न्यायालयीन प्रक्रिया सोपी होणार असून, ठाणे शहरात वारंवार जावे लागणार नाही.
न्यायालय स्थापनेमुळे कायदेशीर प्रक्रियेला गती
मीरा-भाईंदर शहरात न्यायालय स्थापनेमुळे येथील नागरिकांना वेळेत आणि सोयीस्कर न्याय मिळण्यास मदत होणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे नागरिकांनी व्यक्त केले आहे.
(MIM Times साठी विशेष प्रतिनिधी)